कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

 

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

प्रतिनिधी

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा

सचिवालयाने आज याबाबत परिपत्रक काढून माहिती दिली आहे. गांधी यांनी मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात सुरत न्यायालयाने गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती.

या निर्णयानंतर कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला असून देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. सत्ताधाऱ्यांनी लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८ (३) अनुसार जेव्हा एखाद्या संसद सदस्याला दोषी ठरवले जाते व त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा सुनावली जाते तेव्हा त्याची सदस्यता तत्काळ प्रभावाने रद्द होते.

सर्वोच्च न्यायालयाने लिली थॉमस वि. भारत सरकार या खटल्यात निर्णय सुनावताना स्पष्ट केले होते की, जेव्हा कोणीही संसद सदस्य किंवा विधिमंडळ सदस्य दोषी न्यायालयाद्वारे दोषी ठरवला जातो व त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा सुनावली जाते तेव्हा त्या सदस्याची संसदेची किंवा विधिमंडळाची सदस्यता तत्काळ प्रभावाने रद्द होते.


राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा आहे - अजित पवार

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा माध्यमांशी बोलताना धिक्कार केला.

मतमतांतरे असली तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची खासदारकी रद्द करण्याची घटना घडलेली नाही असे स्पष्ट मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.

कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा मुद्दा आमदार नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणीत अशी भूमिका बसत नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले. 

अशा घटना व सर्व प्रकार जनता बघत आहे. राज्यकर्त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असते या देशाच्या पंरपरेला तिलांजली देण्याचे काम झाल्याचा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.

इंदिरा गांधीजींबद्दल अशाप्रकारे तत्कालीन सरकारने घेतलेली भूमिका जनतेला पटली नव्हती. इंदिरा गांधीना आणीबाणीच्या कारणाने १९७७ साली पराभूत केले त्यांनाच १९८० साली प्रचंड बहुमताने देशाच्या पंतप्रधानपदी बसवण्याचे काम देशातील जनतेने लोकशाहीच्या मार्गाने केले. त्यामुळे आताच्या काळात ज्या घटना घडत आहेत ते सर्वसामान्य जनतेला पटणाऱ्या नाहीत असे स्पष्ट बजावत राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही