गोरगरिबांचे डॉक्टर – डॉ. शरीफ गिरकर, तब्बल ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ वैद्यकीय सेवा पुरवणारे धन्वंतरी

 गोरगरिबांचे डॉक्टर – डॉ. शरीफ गिरकर  

तब्बल ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ वैद्यकीय सेवा पुरवणारे धन्वंतरी

------------------

मोंड पंचक्रोशीतच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक खेड्यापाड्यांमध्ये, दुर्गम ठिकाणी जावून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. शरीफ हसनखान गिरकर यांना परिसरातील आबालवृध्दांमध्ये अतिशय आदराचे स्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मोंड मध्ये १९७७ च्या सुमारास त्यांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. होमिओपॅथीमध्ये एलसीईएच करुन त्यांनी मोंडसारख्या दुर्गम व ग्रामिण भागात दवाखाना सुरु केला. मुंबईहून वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर मुंबई व इतर शहरी भागात वैद्यकीय सेवा देण्याची संधी उपलब्ध असताना त्यांनी आपल्या गावी वैद्यकीय सेवा देण्याचा निर्धार केला व तो पूर्णत्वास नेला.

 



सुरुवातीला बस सेवा,एसटी, रिक्षा सेवा उपलब्ध नसताना व तुरळक सेवा उपलब्ध असताना डॉ. गिरकर यांनी या परिसरातील गावागावांमध्ये जावून रुग्ण तपासणी केली आहे. कोकणातील सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीचे भान राखून रुग्णांकडून अतिशय कमी शुल्क घेणे. अनेकदा स्वतःच्या खिशातून गरजू रुग्णांना बससाठी पैसे देणे यामध्ये डॉ गिरकर नेहमी अग्रेसर असतात. हाताला गुण असल्याने व गोरगरिबांच्या परिस्थितीची जाणिव असलेल्या  डॉ. गिरकर यांचे परिसरात मोठे नाव आहे.



 

डॉ. शरीफ हसनखान गिरकर यांचा जन्म २ मार्च १९५३ रोजी मोंड मध्ये शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मोंडमध्ये झाले. महाविद्यालयीन व वैद्यकीय शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर त्यांनी मसीना रुग्णालयात प्रॅक्टीस केली. त्यानंतर ते मोंड मध्ये परतले. मोंड मधील मुस्लिम समाजातील पहिले डॉक्टर होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. डॉक्टरांनी कधीही धर्म, जात, पंथ अशा कोणत्याही चष्म्याने रुग्णाकडे पाहिेले नाही.  एसटी, रिक्षा, खासगी वाहनांची संख्या अत्यल्प असताना अनेक रुग्णांना पालखीतून दवाखान्यात आणावे लागत असे त्यावेळी रुग्णांच्या सोयीसाठी डॉक्टर अनेकदा आजूबाजूच्या गावात जावून व्हिजिटला जावून रुग्ण तपासणीचे काम करत असत. अनेक गावांमध्ये जाण्याचा त्यांचा वार ठरलेला असे त्यामुळे तेथील रुग्णांना दवाखान्यात येण्याऐवजी घराजवळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असे. आता वाहनांची उपलब्धता वाढल्यानंतर हे प्रमाण कमी झाले. 


 

ज्या रुग्णांना अधिक उपचारांसाठी देवगड, कणकवली किंवा ओरोसला पाठवायचे असेल तर डॉक्टर अनेकदा रुग्णासोबत जातात, त्यामुळे धास्तावलेल्या रुग्णाला व  नातेवाईकांना मानसिक व वैद्यकीय आधार मिळत मिळतो. पैसे कमावणे, कट प्रॅक्टिस करणे हा हेतू कधीच डॉक्टरांनी आपल्यासमोर ठेवला नाही. त्यामुळे रुग्णांकडून डॉक्टरांना कमी पैसे मिळाले तरी प्रेम मात्र नेहमीच भरभरुन मिळाले. 

रुग्ण देखील डॉक्टरांना भेटायला खाली हात येत नाहीत. नेहमी भाजी, आंबे, फणस, काजू, गावठी कोंबडीची अंडी किंवा जे त्यांच्या हाती मिळेल ते घेऊन येतात.


रात्री अपरात्री कितीही वाजता रुग्ण अगदी हक्काने डॉक्टरांना हाक मारुन तपासणीसाठी उठवतात. अगदी आज देखील हा शिरस्ता कायम आहे. कोरोना काळात अनेक डॉक्टरांनी रुग्णसेवा बंद केलेली असताना देखील डॉक्टर गिरकर मात्र अव्याहतपणे वैद्यकीय सेवेत कार्यरत राहिेले. 


डॉक्टरांना सुटी माहितच नसावी, असा त्यांचा आजपर्यंतचा दिनक्रम आहे. रविवार असो किंवा अगदी वर्षात एकदा साजरी होणारी रमजान ईद असो दवाखाना बंद करण्यास त्यांना मिळतच नाही. ईदच्या दिवशी दवाखाना बंद असला तरी रुग्ण आल्यावर त्यांना तो उघडावाच लागतो. डॉक्टरांचे शेतीवर मोठे प्रेम आहे त्यामुळे वेळ मिळेल तसा ते बागेकडे लक्ष घालत असतात. शेवटच्या क्षणापर्यंत आपण रुग्णसेवेत कार्यरत राहू असा त्यांचा निर्धार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही