हिंदु मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देश पुढे जाणार नाही - जितेंद्र आव्हाड; मुंब्र्यात सर सय्यद दिवस साजरा
हिंदु मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देश पुढे जाणार नाही,
रक्त सांडले तरी आरक्षण रद्द होऊ देणार नाही - जितेंद्र आव्हाड
मुंब्र्यात सर सय्यद दिवस साजरा
मुंब्रा - प्रतिनिधी
देशाच्या हितासाठी हिंदू मुस्लिम समाज एकत्र येणे आवश्यक आहे, त्याशिवाय देश पुढे जाणार नाही, सामाजिक व सांस्कृतिक माध्यमातून एकत्र आल्याशिवाय एकोप्याची भावना निर्माण होणार नाही, त्यासाठी दोन्ही समाजानी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. सर सय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त मुंब्रामध्ये सर सय्यद दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. पाच हजार वर्षे आम्ही सामाजिक अन्याय सहन केला त्यामुळे रक्त सांडले तरी आरक्षण रद्द होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अरफा खानम शेरवानी, माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान, तन्वीर आलम, अँड डॉ. फारुख खान, तन्वीर आलम उपस्थित होते. सर सय्यद अवेरनेस फोरम, संघर्ष व डॉ असदुल्ला खान यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संघर्षच्या अध्यक्षा रुता आव्हाड यावेळी उपस्थित होत्या.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, अत्याचारा विरोधात बोलल्याशिवाय अत्याचार कमी होणार नाही, त्यामुळे अन्यायाविरोधात आवाज उठवत राहाृला हवे. गेल्या काही वर्षांत राजकीय लाभासाठी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
मुस्लिम समाजाची सामाजिक शैक्षणिक आर्थिक क्षेत्रात पीछेहाट झाली आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणे काळाची गरज आहे.
एएमयु चे केंद्र महाराष्ट्रात येण्यासाठी मी खूप प्रयत्न केले एएमयु व जेएनयु बाबत मला खूप प्रेम आहे. समाजात नथुराम गोडसे प्रवृत्ती वाढत आहेत, गांधी विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुस्लिम समाजाने शिक्षणावर अधिक भर देण्याची गरज आहे, असे आव्हाड म्हणाले.
अरफा खानम म्हणाल्या, सर सय्यद यांनी लेखणीच्या माध्यमातून इंग्रजांपर्यंत आपले विचार पोचवले व हक्कांसाठी लढा दिला. ते लोकशाहीचे खरे पाईक होते. सर सय्यद यांचे विचार आजच्या युगात देखील अत्यंत महत्वाचे आहेत. सर सय्यद यांनी दाखवलेल्या मार्गावर मुस्लिम समाजाने चालण्याची गरज आहे. फेक न्यूज,प्रपोगंडा बनवणाऱ्या बातम्यांपासून सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सध्या देशाला मोठ्या तुरुंगाचे स्वरुप देण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही देशात ही अत्यंत धोकादायक बाब आहे. मुस्लिम समाजाला दुय्यम नागरिकत्वाची वागणूक देण्याचा प्रयत्न केला जात आहे. इस्त्राईल पँलेस्टाईन युध्दात भारतीय पत्रकारांकडून एकांगी चित्रण सुरु
केवळ मुस्लिम द्वेषामुळे इस्त्राईल ला पाठिंबा दिला जात असल्याचा आरोप खानम यांनी केला.
तन्वीर आलम यांनी सर सय्यद यांच्या कारकिर्दीबाबत माहिती दिली. शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यापूर्वी त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेवर भर दिला होता. सध्या देखील एकात्मतेवर भर देण्याची गरज आहे. सांप्रदायिकतेविरोधात सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्रात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकारने जागा उपलब्ध करुन दिली होती मात्र काही विघ्नसंतोषी व्यक्तींमुळे काम रखडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अँड डॉ फारुक खान म्हणाले, सर सय्यद यांची शिकवण केवळ शिक्षणापुरती मर्यादित नव्हती समग्र जीवनासाठी त्यांची शिकवण महत्त्वाची आहे. मुस्लिम तरुणांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे प्रकार बंद होण्याची गरज आहे.
अन्याय अत्याचाराविरोधात कायदेशीर मार्गाने लढा देऊन न्याय मिळवणे सक्षमपणे लढणे महत्त्वाचे आहे.
अब्दुल रहमान यांनी आपल्या भाषणात, मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात यावे, अधिक शिक्षण घ्यावे असे आवाहन केले. सरकार प्रशासनाची भाषा शिकणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा