दिव्यांगांच्या टी स्टॉल वाटपात सावळा गोंधळ, दिव्यांग संघटनांच्या हरकतींनंतरही जाहिरातीशिवाय स्टॉलचे वाटप
दिव्यांगांच्या टी स्टॉल वाटपात सावळा गोंधळ,
दिव्यांग संघटनांच्या हरकतींनंतरही जाहिरातीशिवाय स्टॉलचे वाटप
- त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने दिव्यांगांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलनात्मक मार्ग अनुसरण्याचा इशारा दिला आहे
लोकमानस प्रतिनिधी -
ठाणे - स्वारस्य अभिव्यक्ती देकार तत्वावर दिव्यांगांना सक्षम करण्याच्या उद्देशाने ठाणे महानगर पालिका परिक्षेत्रात चहाचे स्टॉल वाटप करण्यात येणार आहेत. हे स्टॉल उभारण्यासाठी ठाणे महानगर पालिकेकडून जागा देण्यात येणार असून त्याचे संपूर्ण काम मे.टी स्टॉल ऑनर्स वेल्फेअर असोशिएशन, यांस देण्यात आलेले आहे. या संस्थेने तयार केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत गरजू दिव्यांगांना बाजूला सारून मर्जीतील आणि राजकीय वरदहस्त असलेल्या दिव्यांगांचाच समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात ठाणे शहरात कार्यरत असलेल्या दिव्यांगांच्या तिन्ही संघटनांनी हरकत नोंदवून जाहिरात काढून स्टॉलचे वाटप करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने दिव्यांगांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलनात्मक मार्ग अनुसरण्याचा इशारा दिला आहे.
मे.टी स्टॉल ऑनर्स वेल्फेअर असोशिएशन या संस्थेला दिव्यांगांचा आर्थिक तथा सामाजिक विकास होण्यासाठी टी स्टॉल वाटपाचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र, त्यासाठी जी लाभार्थी यादी तयार केली आहे. त्यामध्ये घोळ असल्याचा पहिला आरोप अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे समयन्क मोहम्मद युसूफ खान यांनी केला होता. त्याच धर्तीवर प्रहार अपंग क्रांती संस्थाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश मदन साळवी, दिव्यांग शिवक्रांती सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मुकेश घोरपडे यांनीही तक्रार केल्या आहेत.
ही योजना राबविताना ठाणे महानगर पालिकेने याबाबत स्थानिक तथा प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करुन दिव्यांगांकडून अर्ज मागविण्याची गरज होती. परंतु, तसे करण्यात आलेले नाही त्यामुळे जी 200 लोकांची यादी तयार करण्यात आलेली आहे. ही यादी कंपनीच्या मर्जीतील लोकांची आहे. तसेच, काही स्वयंभू दिव्यांग नेत्यांच्या (ज्यांवर राजकीय वरदहस्त आहे) सांगण्यावरुन ठराविक लोकांना पात्र ठरविण्यात आले आहे., त्यामुळे आधी तयार केलेली यादी रद्द करून नव्याने यादी जाहीर करावी, अशी मागणीही युसूफ खान यांनी केली आहे.
दरम्यान, जाहिराती मागवून लाभार्थी यादी जाहीर करावी; दहा वर्षानंतर दिव्यांगांना कसे पुन:र्वसीत करणार, याची माहिती देण्यात यावी; अन्यथा, कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलनात्मक मार्ग अनुसरण्याचा इशारा खान यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा