जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा, राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीचा देखील राजीनामा
जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा, राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा कार्यकारिणीचा देखील राजीनामा
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई- शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षदाचा दिलेला राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाड यांच्यासहित शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविले आहेत. पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी ही घोषणा केली.
आव्हाड म्हणाले, शरद पवार ही महाराष्ट्राची गरज आहे. शरद पवार हे सक्रीय राजकारणातून बाजूला होणे म्हणजे महाराष्ट्राचे मोठे नुकसान आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , मा. मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली.
सध्या राज्यात वादळ घोंघावत आहे. या घोंघावणाऱ्या वादळाशी लढण्यासाठी शरद पवार हे नाव पाठीशी असलेच पाहिजे. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहित आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे; कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असे शरद पवार हेच आपणाला सांगत आले आहेत. आज कोणाचाही विचार न करता त्यांनी राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडले आहे. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक चळवळीतील भीष्म पितामह आहेत. त्यांच्यातील ऊर्जा आम्हांस बळ देत आहे. माझा राजकीय प्रवास शरद पवार या नावाने चालू आहे. आमचे सर्वांचे जीवन पवारांशी जोडले गेलेले आहे. म्हणूनच आम्ही आजही सांगत आहोत की, शरद पवार यांना राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. त्यांना राजीनामा परत घ्यावाच लागेल, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा