मुंबई पोर्टच्या विकासात गोदी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत - नरेंद्र वाबळे
मुंबई पोर्टच्या विकासात गोदी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत - नरेंद्र वाबळे
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई -
मुंबई शहरात मुंबई पोर्ट हे लँड लॉर्ड पोर्ट असून, पोर्टमधील या जमिनीचा विकास करताना गोदी कामगारांना आपल्या हक्काची घरे मिळाली पाहिजेत, तसेच पोर्ट ट्रस्टच्या भूखंडावरील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची परवानगी संबंधित रहिवाशांना मिळाली पाहिजे, अशी मागणी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी प्रकाशन सोहळ्यात केली.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने बॅलार्ड पिअर येथील मुंबई पोर्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली " पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक " २०२२ चे प्रकाशन नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते म्हणाले की, घरांच्या लढ्यासाठी आमचा आपणास सदैव पाठिंबा राहील. मुंबई पोर्टच्या अध्यक्षांना मी लवकरच भेटणार आहे, त्यावेळेस आपणही माझ्यासोबत यावे. पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकात चांगले साहित्य असून ते आपण वाचले पाहिजे. काही न होणारी कामे देखील पत्रकारांच्या माध्यमातून होत असतात. त्यासाठी वृत्तपत्र एक प्रभावी साधन आहे.
मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे सेक्रेटरी मोहन राजू यांनी पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकाला शुभेच्छा देऊन आपल्या भाषणात सांगितले की, आपल्या मागण्या मी ऐकून घेतल्या असून, त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीन. ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, " कर भला सो हो भला " हे युनियनचे ब्रीदवाक्य असून, आपण नेहमी चांगले कार्य करा, त्याचे फळ आपल्याला नेहमीच चांगले मिळेल. आज राज्यकर्ते मंडळी जाती धर्माच्या नावाखाली विषारी प्रचार करीत असून, त्यापासून आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे. पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांकात कामगारांचे चांगले लेख असून ते आपण वाचले पाहिजे.
युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मुंबई पोर्टमध्ये पूर्वी ४२ हजार कामगार होते आज फक्त ४ हजार कामगार शिल्लक राहिलेत. कोरोनाच्या काळात व आता देखील कामगार कमी असताना कामगारांनी चांगली उत्पादकता वाढवली आहे. युनियनचे कार्याध्यक्ष डॉक्टर यतीन पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्वर्गीय डॉक्टर शांती पटेल यांनी कामगारांसाठी व्यासपीठ तयार केले असून, कामगार या अंकात लिहीत आहेत. हे फार महत्वाचे आहे.
युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी सांगितले की, मुंबई पोर्टच्या दीडशे वर्षाच्या इतिहासामध्ये कामगारांचे व अधिकाऱ्यांचे फार मोठे योगदान आहे. मुंबई पोर्टच्या जमिनीचे नियोजन तयार होत असून, त्यामध्ये कामगारांना घरे मिळाली पाहिजेत. यापूर्वी मंत्रीमहोदयांना युनियन तर्फे अनेक वेळा निवेदन दिले आहे. गोदी कामगारांना घरे मिळण्यासाठी आपणास संघर्ष करावा लागेल.
या प्रकाशन सोहळ्यास नुसीचे सल्लागार अब्दुल गणी सारंग, रेल्वे व हिंद मजदुर सभेचे नेते जे.आर. भोसले, अलंग युनियनचे विठोबा पवार, हिंदी फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य खानोलकर, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे सेवानिवृत्त ट्रॅफिक मॅनेजर आर. एन. शेख, ट्राफिक मॅनेजर( प्रभारी) शेनगर, बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, सौराष्ट्र कर्मचारी संघटनेचे नामदेव शिंदे, साहित्यिक अनंत दाभोळकर, नारायण गव्हाणे, विवेक तवटे, प्रकाश पोळ, विलास देवळेकर, ज्येष्ठ
पत्रकार प्रवीण मंत्री, प्रदीप गोलतकर, आयुर्वेदाचार्य उत्तम भोर, मिलिंद आरोलकर, शशिकांत सावंत, प्रकट महाराष्ट्राचे संपादक दत्ताराम दळवी,सहसंपादक रवींद्र जाधव, साहित्यिक, लेखक, कवी, कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सुंदर सूत्रसंचालन सतीश घाडी यांनी केले तर आभार मनिष पाटील यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा