देशात लोकशाही नव्हे तर हुकूमशाही - खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची टीका,इंडो अरब सोसायटी व इस्लाम जिमखाना तर्फे सिन्हा यांचा सत्कार
इंडो अरब सोसायटी व इस्लाम जिमखाना तर्फे सिन्हा यांचा सत्कार
प्रतिनिधी
मुंबई – देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात लोकशाही नव्हे तर हुकूमशाही आल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरेल व भारतातील लोकशाहीला एक नवीन आयाम मिळेल व ही यात्रा परिवर्तन करेल असा विश्वास सिन्हा यांनी व्यक्त केला.
राजकारण वाईट असेल तर त्याला स्वच्छ करण्याची गरज आहे. चांगल्या व्यक्ती राजकारणात येण्यास तयार नसतील तर त्यांनी वाईट शासकांच्या प्रभावाखाली जगण्यास किंवा मरण्यास तयार राहण्याची गरज आहे, असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले. अभिनेता म्हणून यशस्वी झाल्यानंतर समाजाप्रति असलेल्या जाणिवेतून आपण समाजकारणाकडे व राजकारणाकडे वळल्याचे ते म्हणाले. आपला आजपर्यंतचा प्रवास रसिकांच्या प्रेमामुळे झाला. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्य, आत्मविश्वास, परिश्रम, समर्पण गरजेचे आहृ, असा सल्ला त्यांनी दिला.
शत्रुघ्न सिन्हा यांचा तृणमुल कॉंग्रेसतर्फे लोकसभेवर खासदार म्हणून विजय झाल्याबद्दल इंडो अरब सोसायटी व इस्लाम जिमखाना तर्फे त्यांचा इस्लाम जिमखाना येथे नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कायदेतज्ञ तथा माजी खासदार मजीद मेमन, इंडो अरब सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद अली पाटणकर, इस्लाम जिमखानाचे अध्यक्ष माजी आमदार युसूफ अब्राहणी, एड. अब्बास काझमी, डॉ. समी बुबेरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडो अरब सोसायटीचे संयुक्त सचिव नबी अख्तर कुरैशी, मजीद शेख यांनी प्रयत्न केले.
पाटणा ते फिल्म इन्स्टिट्यूट पर्यंतचा व तिथून राजकारणा पर्यंतचा प्रवास यावेळी सिन्हा यांनी उलगडला. देशातले प्रख्यात वकील मजीद मेमन हे माझे जीवलग मित्र असून त्यांच्या स्कूटर ते विमान या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. माझा प्रवास देखील त्यांनी जवळून बघितला आहे. मजीद मेमन खासदार होते व लवकरच खासदार होतील, अशी खात्री सिन्हा यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा