गणेशभक्तांसाठी शिवसेना ठाणे जिल्ह्याच्यावतीने 400 एस.टीच्या बसेस सोडणार
गणेशभक्तांसाठी शिवसेना ठाणे जिल्ह्याच्यावतीने 400 एस.टीच्या बसेस सोडणार
सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी चाकरमान्यांनी मोफत एस.टी सेवेचा लाभ घ्यावा : नरेश म्हस्के
लोकमानस प्रतिनिधी
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेतर्फे ठाणे शहरातून एकूण 400 एस.टी.च्या बसेस मोफत सोडण्यात येणार आल्याची माहिती शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली.
गणेशोत्सव हा हिंदू लोकांच्या जिव्हाळ्याचा सण असून दरवर्षी गणेशभक्त आवर्जुन आपापल्या गावी जात असतात. गणेशोत्सवासाठी कोकण आणि घाटमाथ्यावर जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेचे आरक्षण सहा महिने अगोदरच झाल्यामुळे तिकिट मिळविणे जिकिरीचे होते. तसेच उत्सवादरम्यान खाजगी बसेसचे भाडे सुद्धा परवडणारे नसते. तसेच अनेकदा एस.टी.चे आरक्षण मिळत नाही यासाठी चाकरमान्यांना दिलासा मिळावा व त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शिवसेनेच्यावतीने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने एस.टी. बसेस सोडण्यात येणार आहे. कोविडच्या कालावधीतही ठाणे शहरातून गणेशोत्सवासाठी प्रवाशांना एस.टी.ची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचेही नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.
ठाणे शहरातून पाली, माणगांव, महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ वेंगुर्ला, वैभववाडी, सावतंवाडी, दोडामार्ग, शिरोडा या मार्गावर तसेच सातारा, कराड, पाटण, कोल्हापूर, गडहिंग्लज या मार्गासाठी देखील बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
कोकणात जाण्यासाठी ठाण्यातून सोडण्यात येणाऱ्या बसेसचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरुन ठाण्यातून एस.टी. संबंधित गावी पोहचल्यानंतर तेथून चाकरमान्यांना घरी जाणे सहज शक्य होईल अशा दृष्टीने नियोजन केले असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी दिली. 28 व 29 ऑगस्ट 2022 रोजी या बसेस सोडण्यात येणार आहेत. 400 बसेसच्या माध्यमातून एकूण 20 हजार चाकरमानी या बसमधून कोकणात जाणार आहेत. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली परिसरातील गणेशभक्तांसाठी देखील एस.टीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
दरवर्षी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने गणेशभक्तांसाठी एस.टी.ची सोय करण्यात येते. यंदाही प्रत्येक विभागात फलक लावून मोफत बससेवेसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नावनोंदणी केली आहे. अजूनही ज्या प्रवाशांना या सेवेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी त्यांनी माजी परिवहन सभापती अनिल भोर यांचेशी 9930855235 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाण्यातून कोकण व घाटमाथ्यावर जाणाऱ्या चाकरमान्यांनी या एस.टी.बससेवेचा लाभ घ्यावा व आपला प्रवास सुरक्षित व सुखकर करावा असे आवाहन करीत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा