गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करा व बहुमत सिध्द करा, राज्यपालांचे निर्देश राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
गुरुवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आयोजित करा व बहुमत सिध्द करा, राज्यपालांचे निर्देश
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च
न्यायालयात याचिका
लोकमानस प्रतिनिधी
मुंबई-
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांच्या मागणीनंतर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला गुरुवारी ३० जून रोजी बहुमत सिध्द
करण्याचे निर्देश दिले आहेत. काही आमदारांनी
देखील राज्यपालांना मेल पाठवून बहुमत चाचणीची मागणी केली होती.
राज्यपालांनी विधानभवनाचे प्रधान सचिव
राजेंद्र भागवत यांना पत्र लिहून ३० जून रोजी विधिमंडळाचे एकदिवसीय अधिवेशन आयोजित
करावे व त्यामध्ये सरकारने बहुमत सिध्द करावे, असे निर्देश दिले आहेत. सकाळी ११
वाजता अधिवेशनाला प्रारंभ करावा व सायंकाळी पाच वाजेपर्यंत कामकाज आटोपण्यात यावे
असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता विधान भवनाच्या आत व
बाहेर पुरेसा बंदोबस्त ठेवावा असे राज्यपालांनी पत्रात लिहिले आहे.
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना
सर्वोच्च न्यायालयात
तातडीने अधिवेशन बोलावण्याच्या व बहुमत चाचणी घेण्याच्या राज्यपालांच्या या निर्देशांविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी घाईघाईने अधिवेशन बोलावणे हे संविधानाचे उल्लंघन असल्याचा दावा शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू व शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांना सायंकाळी पाच वाजेपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्य सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा